मनमानी कारभाराला वैतागून मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचा बीडला रामराम?; नगर परिषदेतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
बीड | प्रतिनिधी
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेड येथे बदली झाल्यानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रामाणिक, नियमप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या फडसे यांच्या बदलीमागे नगर परिषदेतील कथित मनमानी कारभार, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय कामकाजातील अडथळे कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. आमदार साहेब आपल्याकडे मोठ्या आशेने बिडकर यांनी सत्ता दिली आहे यामुळे भविष्यात चांगले अधिकारी आपल्याकडे असणे महत्त्वाचे आहे फक्त आपले काही नगरसेवक काही सभापती मनमानी करतात त्यांना आवरा…
शहराच्या विकासासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील काही घटकांकडून सहकार्य मिळत नसल्यास अशा अधिकाऱ्यांना काम करणे कठीण होते, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. नगर परिषदेतील काही सभापती आणि नगरसेवकांकडून होत असलेल्या कथित मनमानीमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. “सत्ता विकासासाठी मिळाली आहे. मात्र, जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसेल, तर चांगले अधिकारी जिल्ह्यात टिकणार कसे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी वारंवार बदली मागून जिल्हा सोडत असतील, तर त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषदेतील कामकाज अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि विकासाभिमुख करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शैलेश फडसे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते आणि नव्या मुख्याधिकाऱ्यांना कामकाजासाठी आवश्यक सहकार्य मिळते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. बीड शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाची गरज असून, मनमानीला आळा घालून विकासाला प्राधान्य देण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.













