बीड : मातीशी नाळ जोडलेला, शेतकऱ्यांच्या घामाचे मोल जाणणारा आणि सर्वसामान्यांच्या वेदना स्वत:च्या मानणारा एक सामान्य शेतकरी पुत्र… ज्याने कधी सत्तेची मिजास बाळगली नाही, पण जनसेवेचे व्रत मात्र हृदयाच्या कोपऱ्यात प्राणापलीकडे जपले. हा प्रेरणादायी प्रवास आहे खा.बजरंग सोनवणे यांचा!. बीडच्या जनतेने दिलेल्या विश्वासाला आणि बाप्पांच्या लोकप्रतिनिधी म्हणून संसदेतील अविरत संघर्षाला दि.४ रोजी यशस्वी २ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही दोन वर्षे केवळ खासदारकीची नाहीत, तर बीड जिल्ह्याच्या हक्कासाठी दिल्लीच्या तख्तासमोर दिलेल्या खंबीर लढ्याची आणि विकासाच्या वचनपूर्तीची आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव हा अनेकांसाठी शेवट ठरला असता, पण बाप्पांनी त्या पराभवाला जनतेच्या अधिक जवळ जाण्याची संधी मानली. पुढील पाच वर्षे त्यांनी कोणत्याही पदाची लालसा न ठेवता गावोगावी संपर्क वाढविला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसले आणि रुग्णालयांमध्ये रडणाऱ्या नातेवाईकांना धीर दिला. जनतेशी असलेली ही रक्ताची नाळ इतकी घट्ट झाली की, २०२४ मध्ये बीडच्या जनतेने आपल्या शेतकरीपुत्राला दणदणीत बहुमताने संसदेत पाठवून संघर्षाचा ऐतिहासिक सत्कार केला. गेल्या दोन वर्षांत त्यांनी संसद, मंत्रालये, प्रशासन आणि जनता यांच्यात एक सक्षम व प्रभावी दुवा म्हणून कार्य केले आहे. रेल्वे आणि विमानसेवेचा अविरत पाठपुरावा बीड जिल्ह्याला राष्ट्रीय रेल्वे नकाशावर सक्षम स्थान मिळवून देण्यासाठी खा.सोनवणे यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे सर्वेक्षणासाठी ६ कोटींचा निधी मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले असून, अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. यासोबतच जुन्नर-चौंडी-आष्टी नवीन रेल्वेमार्ग, बीड-नगर-मुंबई, बीड-नगर-पुणे आणि पुणे-परळी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. बीडमध्ये विमानतळ उभारणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून विमानतळ सर्वेक्षण प्रक्रियेला गती देण्याचे कामही त्यांनी केले असून बीडला देशाच्या विमान वाहतूक नकाशावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे.
०००
रस्ते विकासासाठी ४२१ कोटींचा निधी
जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि विकासाला वेग देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांच्या विविध कामांसाठी ४२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच योजनेतून ४० कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी मिळाली असून, पीएमजीएसवाय अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. बायपास, उड्डाणपूल, फूटओव्हर ब्रिज, रोड ओव्हर ब्रिज आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी अपघातप्रवण ब्लॅकस्पॉट निश्चितीवर त्यांचा विशेष भर आहे.
०००
रुग्णांना ४.९२ कोटींची मदत
बीडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, ही मागणी त्यांनी संसदेत लावून धरली. ३३ आरोग्य केंद्रांसाठी २२ कोटींचा निधी उपलब्ध करून देत, डॉक्टरांची कमतरता, आशा सेविकांच्या मानधनाचा प्रश्न आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रश्न राष्ट्रीय व मंत्रालय स्तरावर उपस्थित केले. एमडी व पीजी डॉक्टरांच्या १८ तासांच्या ड्युटीचा मुद्दाही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मांडला. विशेष मध्ये, आजारापेक्षा उपचाराच्या खर्चाने खचणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी बाप्पा खंबीर आधार बनले. खासदार कार्यालयाच्या माध्यमातून एकूण ४ कोटी ९२ लाख रुपयांची थेट वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.
००
संसदेत शेतकऱ्यांचा बुलंद आवाज
कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खा.सोनवणे यांनी संसदेत आक्रमक भूमिका घेतली. ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा’ या सूत्रावर हमीभाव मिळवा, अशी मागणी त्यांनी केली. पीकविमा, नुकसानभरपाई, कर्जमाफी, मराठवाड्यासाठी विशेष कृषी पॅकेज, सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करणे आणि वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई यासाठी त्यांनी संसद ते रस्त्यापर्यंत लढा दिला आहे. दुधाच्या रास्त दरासाठी त्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तसेच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन दिलासा दिला.
०००
दुष्काळमुक्तीसाठी ‘उजनी-मांजरा लिंक’चा संकल्प
बीड जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी उजनीचे पाणी मांजरा धरणात आणा, ही जनभावना त्यांनी संसदेत अत्यंत प्रभावीपणे मांडली असून उजनी-मांजरा लिंक प्रकल्पासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच जल जीवन मिशन आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांनी भरीव निधीची मागणी केली आहे.
००
उसतोड मजूरांसाठी उठविला आवाज
ऊसतोड कामगार व सामाजिक न्याय बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा न राहता ऊस उत्पादक जिल्हा व्हावी, यासाठी प्रयत्न करतानाच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कारखान्यांवर शाळा सुरू करण्याची संवेदनशील मागणी त्यांनी केली. कामगारांना सामाजिक सुरक्षा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
००
आरक्षण लढ्यात मावळा म्हणून सहभाग
सामाजिक न्यायाची भूमिका घेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी संसदेत आणि रस्त्यावर संघर्ष केला; ते आंदोलनस्थळी खासदार म्हणून नव्हे, तर समाजाचा एक सामान्य मावळा म्हणून सहभागी झाले. यासोबतच धनगर, बंजारा, मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी त्यांनी आवाज उठवला.
००
ठेवीदारांसाठी केंद्राकडे पाठपुरावा
१ महिला, युवा आणि ठेवीदारांसाठी संघर्ष महिला सक्षमीकरणासाठी १२१ महिला बचत गटांना ५.१० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करून ‘महिला उद्योगशील बीड’ ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली.
२ विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमधील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये परत मिळावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन लिक्वि डेशन प्रक्रिया गतिमान केली.
३ याशिवाय कनिष्ठ वकिलांना मानधन, दिव्यांगांच्या समस्या, युवकांचा रोजगार, बंद असलेली ग्रामीण पोस्ट कार्यालये, बँकिंग सुविधा आणि मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात नवीन टॉवर्स सुरू करण्यासाठीध त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
४ बीडमध्ये नागरी वन उभारणीचा मुद्दा संसदेत मांडून त्यांनी पर्यावरणपूरक बीडचा ध्यास घेतला आहे.
००
‘जनता दरबार’, हक्काचा आधार
खा.सोनवणे यांच्या कार्यपद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भरणारा ‘जनता दरबार’. कोणत्याही शिफारशीशिवाय थेट खासदारांना भेटून आपली अडचण सांगता येत असल्याने हजारो नागरिकांचे प्रश्न तत्काळ सुटत आहेत. फोन, भेटी आणि कार्यालयातून मिळणारा तत्पर प्रतिसाद यामुळे जनमानसात त्यांची खासदार नव्हे,’आपला माणूस’, अशी ओळख निर्माण झाली आहे. पद मिळाल्यानंतर बदलणारे अनेक पाहिले, पण खासदारकी मिळूनही मातीशी व जनतेशी नाळ कायम ठेवणारे नेतृत्व म्हणून खा.बजरंग सोनवणे यांच्या या दोन वर्षांच्या कार्यकाळाकडे पाहिले जात आहे.













