गेवराई विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत संपन्न
गेवराई प्रतिनिधी ः- मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गेवराई विधानसभा क्षेत्रीय समितीची बैठक आ. विजयसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई येथे संपन्न झाली. बैठकीला माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. मग्रारोहयोसह इतर योजनेत मंजुर असलेली रस्त्यांची कामे वगळून इतर शिवरस्ते, शेत रस्ते, पाणंद रस्ते आदी रस्त्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या ठरावासह दाखल करण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. बैठकीला संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या संदर्भात गेवराई विधानसभा क्षेत्रीय समितीची आढावा बैठक शुक्रवार, दि.१३ फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, गेवराई येथे संपन्न झाली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, तहसिलदार चंद्रकांत शेळके, तहसिलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी अनिरुध्द सानप, गेवराई तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, माजलगाव तालुका कृषी अधिकारी बी.जी.बादाडे, उपअभियंता एस.एस.चोपडे, व्ही.व्ही.धोंगडे, भुमिअभिलेख कार्यालयाचे आर.बी.गवळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार तथा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी मार्गदर्शन कले. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांना बळकटी मिळेल, त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असताना त्यात कसल्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये ग्रामपंचायतींनीही या योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी व्हावे असे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, महायुती सरकारने शेत रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते ही अतिशय प्रभावी योजना सुरु केली आहे. या योजनेत रोहयोसह इतर योजनेतून मंजुर असलेल्या रस्त्यांच्या कामाशिवाय इतर कामे, नकाशावरील अस्तित्वातील रस्ते, शेतरस्ते आदींना प्राधान्याने मंजुरी दिली जाणार आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतींनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव तहसिल कार्यालयात येथे दाखल करावेत असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
![]()













