राज्यस्तरीय नियोजन बैठकीत आ. विजयसिंह पंडित यांची मागणी
बीड प्रतिनिधी ः- सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियोजन बैठक संपन्न झाली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे आ. विजयसिंह पंडित यांनी या बैठकीत सहभागी होत बीड नगर परिषद हद्दीत दिवंगत स्व.अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक पध्दतीने त्यास मान्यता देऊन हिरवा कंदिल दाखविला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि.१२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीत सहभागी झाले. स्व.अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्विकारल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात अनेक विकास कामांची सुरुवात केली. अनेक विकास योजना सक्षमपणे राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून स्व.अजितदादांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जनतेने आश्वासक विकासाचे स्वप्न पाहिले आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात कर्तृत्ववान पालकमंत्री म्हणून दिवंगत दादांचा नक्कीच उल्लेख होणार आहे. त्यांच्या स्मृती बीडकरांसाठी सदैव प्रेरणादायी असल्यामुळे बीड नगर परिषद कार्यक्षेत्रात दिवंगत अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी लागणारा निधी राज्यस्तरीय नियोजनातून विशेष बाब म्हणून उपलब्ध करावा, अशी मागणी या बैठकीत आ. विजयसिंह पंडित यांनी केली. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मान्यता दिली असून दिवंगत अजितदादा पवार यांच्या बीड शहरातील भव्य स्मारकास त्यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दिवंगत अजितदादा पवार यांनी जोमाने विकास कामांना सुरुवात केली होती. त्यांच्या विकासाभिमुख भुमिकेमुळे बीड जिल्ह्यातील जनतेत त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या अकाली जाण्याने बीड जिल्ह्यातील जनतेने दुःख आणि संवेदना व्यक्त केल्या, बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये स्व.अजित पवार यांच्या स्मृती कायम राहणार आहेत. भविष्यात त्यांचे विचार जिल्ह्यातील जनतेला प्रेरणादायी ठरणार असल्यामुळे त्यांचे स्मारक बीड शहरात होणे गरजेचे असून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी या कामासाठी हिरवा कंदिल दाखविला असल्याची माहिती आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. आ. विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.
![]()















