कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांचे पाच पैकी चार निर्णय फेटाळले आणि एक प्रकरण उच्च न्यायालयात सुरू
परळी वैजनाथ प्रतिनिधी : एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेबाबत गंभीर मुद्दे जनतेसमोर मांडले आहेत. सध्या सुरू असलेल्या येथील नगर परिषद निवडणुकीत अधिकाऱ्यांनी घेतलेली जगजाहीर पक्षपाती भूमिका सर्व राज्य बघत आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर, व्यंकटेश मुंडे, त्र्यंबक कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयां विरोधात आमचे सहकारी कोर्टात गेले होते.
कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांचे पाच पैकी चार निर्णय फेटाळले आणि एक प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. या सर्व जागांची निवडणूक सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी होणार आहे. दिवसाढवळ्या निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रताप जनता बघत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करूनही दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
त्यामुळे येऊ घातलेल्या पाच जागांच्या निवडणुका आणि मतमोजणीत मोठी हेराफेरी होऊ शकते. लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र सरकारने व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी येथील पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दीपक नाना देशमुख यांनी केली आहे.














