परळी मतदारसंघात खत पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – पेरणीच्या तोंडावर काही डीलर्स स्वतःकडे खताचा साठा असूनही तो लपवत असल्याचा व कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याच्या तक्रारी येत असून, कृषी विभागाकडूनही काही प्रमाणात खत येणे बाकी असून आवश्यक साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच स्थानिक डीलर्स कडे उपलब्ध असलेल्या साठ्याची आकडेवारी तात्काळ समोर आणावी, अशा सूचना आज माजी कृषमंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी खत व्यवस्थापन प्रमुख तसेच स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांना केल्या आहेत.
जून अखेर परळी मतदारसंघात आवश्यक असलेल्या युरियासह, डीएपी व अन्य आवश्यक खतांच्या साठ्यामध्ये जो फरक आहे, तो फरक रेक लावून तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत सूचना केल्या.
खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणे तसेच प्रमुख मागण्या असलेली व नामांकित खते डावलून जाणीवपूर्वक लिंकिंग करत निकृष्ट दर्जाची खते पर्याय म्हणून जबरदस्तीने विकणाऱ्या डीलर्स व दुकानदारांची नावे उघड करून त्यांच्यावरती तातडीने शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी असेही सूचना धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खरीप हंगामाच्या तोंडावर खत बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, यासाठी बफर स्टॉक सह यापुढील प्रत्येक घडामोडीची आकडेवारी सह माहिती देण्यात यावी याबाबतही धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. यावेळी प्र. तहसीलदार श्रीमती पठाण, ए डी ओ गरांडे, परळी व अंबाजोगाई चे तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, अजय मुंडे, अभय मुंडे, राजाभाऊ पौळ यांसह आदी उपस्थित होते.
*जनता संवाद, गर्दी अन् जागच्या जागीच तोडगा, धनंजय मुंडेंचा दरबार पुन्हा गजबजला…!*
धनंजय मुंडे जिथे जातील तिथे गर्दी, आपल्या समस्या, अडचणी व मागण्या घेऊन येणारे कार्यकर्ते व सामान्य नागरिक आणि त्याच ठिकाणी त्यांच्या समस्यांवर जागच्या जागीच तोडगा काढणारे धनंजय मुंडे, असे धनंजय मुंडे यांच्या जनता दरबाराचे स्वरूप सबंध राज्याला परिचित आहे!
आजापणामुळे व विविध आघात सहन केल्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा सक्रिय झालेल्या धनंजय मुंडे यांच्या भोवती पुन्हा तितक्याच ताकदीने परळी मतदारसंघ, बीड जिल्हा इतकेच नव्हे तर जिल्हा बाहेरून देखील कार्यकर्ते व सामान्य नागरिकांची गर्दी जमा होऊ लागली असून, त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेत जागच्या जागीच त्यावर तोडगा काढण्याची धनंजय मुंडे यांची प्रचलित कार्यपद्धती पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे.