गेवराई प्रतिनिधी ः- ज्यांच्या अंगात कर्तृत्व नाही त्यांच्या हाती तुम्ही अनेक वर्षे नगर पालिकेची सत्ता दिली. चुकीच्या माणसाच्या हाती सत्ता दिल्यामुळे बीड शहराचे वाटोळे झाले. मला बीड शहरासह जिल्ह्यात चांगले काम करायचे आहे त्यासाठी तुमची साथ मला हवी आहे. नगर पालिकेची सुत्रे चांगल्या लोकांच्या हाती दिली तर चांगले काम होईल. त्यांना तुम्ही 35 वर्षे पालिकेची सत्ता दिली आता तुम्ही मला फक्त पाच वर्षे नगर पालिका ताब्यात द्या हा अजित पवार चांगले काम करून दाखवील याचा शब्द देतो. बीड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम मित्रपक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाचे 52 उमेदवार घडी आणि धनुष्यबाण चिन्हाचे बटन दाबून विजयी करून आम्हा सर्वांना चांगले काम करण्याची संधी द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांनी केले. बीड शहरातील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स येथे नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या 52 उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते.
बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम मित्रपक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. विजयसिंह पंडित, माजी आमदार भिमराव धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या डॉ.ज्योतीताई मेटे, पक्षाचे निरीक्षक माजी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे शेख निजाम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक फारुक पटेल, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा प्रिया डोईफोडे, प्रा.सुनिल मगरे, दिलीप गोरे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे, सर्व नगरसेवक उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा चेहरा ना. अजितदादा पवार आहेत. दादांचा चेहरा आश्वासक आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला बीड शहराचा विकास करायचा आहे. बीड शहराची दुसरी बारामती करण्यासाठी आपले शहर नावारुपाला आणण्यासाठी ना. अजितदादांच्या हातात आपल्या बीड नगर परिषद द्यायची आहे. आज विरोधक ही निवडणुक चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही मात्र विकासाच्या मुद्यावर ही निवडणुक लढवत असून बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे सर्व उमेदवार प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे अनिल जगताप म्हणाले की, क्षीरसागरांनी 35 वर्षे मुस्लिम समाजाच्या जीवावर न.प.सत्ता भोगली पण आज ते सर्वकाही विसरून जातीवाद करत आहेत, आम्ही हे होवू देणार नाहीत. आम्ही सर्व एकत्र येऊन एका विश्वासाने ही निवडणुक लढवत आहोत. तुमच्या विश्वासाच्या आधारावरच बीड जिल्ह्याचा संपुर्ण सर्वांगिन विकास आम्ही करू, आपल्याला ना. अजितदादा पवार आणि ना. एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठी विकास कामे करायची आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचे आशिर्वाद आम्हाला मतांच्या माध्यमातून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बोलताना डॉ.ज्योती मेटे म्हणाल्या की, 35 वर्षे न.प.सत्ता मिळवणाऱ्यांनी विकास न करता बीड शहर भकास करण्याचे पाप केले. इथे भुमिगत गटारे नाहीत, पाण्यासाठी आठ-आठ दिवस माता-भगिनींना वाट पहावी लागते हे सर्व थांबायला हवे. बीडचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ना. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांच्या झोळीत मतांचे दान टाका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना अजितदादा पवार पुढे म्हणाले की, बीड शहर सर्व धर्मभाव जपणारे आहे, सर्व जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. अनेक वर्षे एका कुटूंबाची सत्ता बीड नगर परिषदेवर होती परंतु त्यांनी काही चांगले काम केले नाही. जाऊ तिथे खाऊ हे त्यांचे भ्रष्ट धोरण होते. अशा लोकांच्या हातात सत्ता दिली त्यामुळे बीड भकास झाले हे आपल्याला बदलायचे आहे. कंकालेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करायचा आहे, इथे ड्रेनेज करायचे आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण करायचे आहे, बीड शहराला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी काम करायचे आहे, महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारायचे आहे. सर्वकाही करायचे आहे, त्यासाठी नगर पालिकेची सत्ता तुम्ही आमच्या ताब्यात द्या, टप्प्याटप्प्याने हे काम केले जाईल. आम्ही उभा केलेले उमेदवार निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न आहेत, ते चुकीचे काही करणार नाहीत, आम्ही करूही देणार नाहीत, मी वेळोवेळी आढावा घेईन. त्यासाठी तुमची खंबीर साथ आम्हाला हवी आहे. एक हाती सत्ता द्या चांगले काम करून दाखवील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यांनी केला राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश …
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट झुंजार धांडे, संदिप आदमाने, डॉ.इद्रीस हाशमी, शिवसेनेचे कल्याण कवचट, सद्दाम खदीर, खमर अली खान यांनी ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केल.