बीड :- वीट भट्यासाठी मोकळया हायवामधून होणारी अवैध वाहतुकीमुळे प्रदुषण वाढत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे तसेच खाली सांडलेल्या राखेमुळे वातवरणीय बदल रोखण्यासाठी बदं हायवामधून ही वाहतूक होईल याकडे संबधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रगती सभागृहात जिल्हयातील अवैध वाळू व तत्सम गौण खनिज उत्खणनामुळे होणारा पर्यावरणाचा –हास, बीड जिल्हयातील अवैध डोंगर पोखरल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी तसेच औष्णिक वीज प्रकल्प, परळी येथे होणा-या राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण या बैठकी प्रसंगी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
चिमणीपासूनचे प्रदुषण नियत्रंणात असले तरी राख उचलणे हे संबधित अधिका-यांचे दायित्व आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राखेचे अनाधिकृत साठे सील करावेत. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत, राखेची वाहतुक मुख्य रस्त्यांवरून न करता ती बाह्य मार्ग अर्थात बायपास द्वारे करावी. दाऊतपूर एरियामध्ये किती राख आहे. याचे रेकार्ड ठेवणे राखेचा साठा आजमितीला आहे तेवढाच पुढील तपासणीपर्यंत असायला हवा नसता संबधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही याप्रसंगी श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
अवैध गौणखणिज वाहतुक
वाळू,दगड,माती,मुरुम, इतर खडी याची अवैध वाहतूक करणा-या किती लोकांवर कारवाई केली तसेच वाळू घाटांची संख्या किती. जप्त केलेली वाळू ही पंडीत दिन दयाळ उपाध्याय घरकूल योजनेसाठी वापरावी. गौण खणिजाचे अवैध उत्खणनावर प्रतिबंध घालावा असेही यावेळी श्रीमती मुंडे म्हणाल्या.
*डोंगराचे अवैध उत्खनन*
डोंगराचे अवैध उत्खनन करणाऱ्यांना दंड करावा, दर 3 महिन्याला याचा अहवाल सादर करावा. डोंगराखाली होणारी प्लॉटींग अवैध असल्यास त्यावर प्रतिबंध घालावा. डोंगर पोखरल्यामुळे खाली राहणा-या कुंटूंबावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही त्या यावेळी म्हणाल्या
या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती मुंडे यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशन व्दारे माहिती देण्यात आली बैठकीचे प्रस्ताविक आभार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मानले.